नवाब मलिक यांची उचलबांगडी ! मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार गटाकडून ‘या’ महिला नेत्याला संधी

मुंबई – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar) मुंबईच्या अध्यक्षपदी राखी जाधव (Rakhi Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Navab Malik) यांची उचलबांगडी केल्याचे बोलले जात आहे. या आधी अजित पवार गटाकडून समीर भुजबळ (Samir Bhujbal) यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.(Mumbai Ncp)
नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार गटाकडून (Sharad Paawar group) ही नियुक्ती करण्यात आली. नबाव मलिक यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा अतिरिक्त भार हा महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली.
दरम्यानच्या काळात नवाब मलिक हे जामीनावर बाहेर आले असले तरी त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती. ते अजित पवार गटाला साथ देणार असल्याचीही चर्चा होती. पण मलिकांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केली नाही.
नवाब मलिकांची भूमिका तटस्थ
नवाब मलिक जेलमधून जरी बाहेर आले असले तरी वैद्यकीय कारणास्तव सध्या ते पक्षीय कामकाजात सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी दुसऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मनी लॉंड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यानंतर नवाब मलिक तुरुंगात होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांना वैद्यकीय आधारावर सुप्रीम कोर्टाकडून दोन महिन्यांचा जामीन मिळाला. परंतु राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपला पाठिंबा कोणाला हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.





