Rajur Bandh – भंडारदरा धरणातून राजूरला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करा, या मागणीसाठी आज राजूर बंद करून रास्ता रोको करण्यात आला. राजूरमध्ये फेरी काढत राजूरकर भर उन्हात कोल्हार- घोटी रोडवर बसले होते. आदिवासी भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या राजूर शहराला वाढती लोकसंख्या लक्षात घेता भंडारदरा धरणातून राजूर गावाला पाईपलाईनमधून पाणी मिळावे. कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, मागील दहा महिन्यांपासून राजूरला सहा ते आठ दिवसांनी पाणी येत आहे. या त्रासामुळे आज ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा व कायमस्वरूपी यावर तोडगा काढण्यासाठी भंडारदरा धरणातून पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आज आंदोलनकर्त्यांनी मांडली. सामजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांनी राजूरच्या पाणी प्रश्नावर सडेतोड भूमिका मांडतानाच राजूर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी आरोप केले.राजूर हे मध्यवर्ती गाव आहे. ज्याप्रमाणे इतर शहरांना धरणातून थेट पाणी दिले जाते, त्याचधर्तीवर राजूरला भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र योजना मिळावी, अशी मागणी राजूर ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, गावाला सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद केले. यावेळी रजनी टिभे , नंदकिशोर चोथवे, राम पन्हाळे, राजेंद्र वाघ, काशिनाथ भडांगे, सामजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांनी मनोगत व्यक्त केले. मंडलाधिकारी कल्पना भोजने यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जीवन प्राधिकरण अधिकारी मधुकर बिन्नर, ग्रामविकास अधिकारी राकेश पाटील, तलाठी राकेश साबळे, माजी सरपंच गणपतराव देशमुख, किरण माळवेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.