‘ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या विधानावर राजू शेट्टी म्हणतात,”पन्नास हजार, पन्नास खोक्यांपुढे कमीच पण…”
मुंबई – परतीच्या पावसामुळॆ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने बळीराजाची ऐन दिवाळीत चिंता वाढली आहे. अशात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओल्या दुष्काळाबाबत केलेल्या विधानामुळे माजी खासदार आणि स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
आमचे कृषिमंत्री म्हणतात,ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असं म्हणत राजू शेट्टी यांनी अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला आहे. 20 गुंठे जमीन असणाऱ्या एका छोट्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये ही रक्कम डोंगराएवढेच आहे. हे पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील पण शेतकऱ्याला एक रुपया गाडीच्या चाका एवढा असतो असा टोला शेट्टी यांनी लगावला आहे.
मंत्री सत्तार नेमकं काय म्हणाले होते ?
परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले,राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. आम्ही पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल.





