“आता ‘त्यांना’ नेतृत्वही फेसबुक लाईव्हचं भेटलं” ; वसंत मोरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशावर मनसेचा खोचक टोला

Raju Patil on Vasant More । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून लोकसभा लढवणाऱ्या वसंत मोरे यांनी आता वंचित बहुजन आघाडी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते आता लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. त्यानंतर आपण ९ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे वसंत मोरेंनी स्पष्ट केले.
मनसेनंतर, वंचित आणि त्यानंतर आता ठाकरे गट असा प्रवास वसंत मोरेयांनी केला त्यावरून आता त्यांच्यावर टीका होतीय. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वसंत मोरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चात्ताप नक्की होईल. कारण आता त्यांना नेतृत्वही फेसबुक लाईव्हचं भेटलंय”, असा खोचक टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लगावला आहे.
ही निवडणूक आगामी काळातील कदाचित लिटमस टेस्ट Raju Patil on Vasant More ।
राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना राजू पाटील म्हणाले, “विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करता आली असती. मात्र, कुठेतरी काही लोकांना वाटत असेल की विधानपरिषदेची निवडणूक व्हावी आणि आपली शक्ती तपासून घ्यावी. ही निवडणूक आगामी काळातील कदाचित लिटमस टेस्ट ठरू शकते. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असावी”, असे राजू पाटील यांनी यावेळी म्हटले.
पुढे विधानपरिषदेच्या निवडणुकीत मनसे महायुतीबरोबर राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता राजू पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने पाठिंबा दिला होता. आता राज ठाकरे जो आदेश देतील त्यांना मी मतदान करणार आहे. कारण या निवडणुकीत जे मित्र पक्ष आहेत, त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे”, असे भाष्य राजू पाटील यांनी यावेळी केले.
आता ‘त्यांना’ नेतृत्वही फेसबुक लाईव्हचं भेटलं Raju Patil on Vasant More ।
वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडत आता ते लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यावर बोलताना राजू पाटील म्हणाले, “वसंत मोरे यांची काय भूमिका आहे? यावर मी बोलण्यापेक्षा त्यांना मनसे सोडल्याचा पश्चात्ताप नक्की होणार आहे. मनसेत जे प्रेम मिळत होतं, जनाधार मिळत होता तो तिकडे नाही. आता वंसत मोरे यांना नेतृत्वही फेसबुक लाईव्हचं भेटलं आहे. वंसत मोरे यांच्याशी मिळतं जुळतंच नेतृत्व त्यांना भेटलं आहे. त्यामुळे ते थोड्या दिवस तेथे व्यवस्थित राहतील”, असा टोला राजू पाटील यांनी वंसत मोरेंना लगावला आहे.





