Rajnath Singh : मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या इच्छेप्रमाणे नक्कीच घडेल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूचक वक्तव्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनता चांगलचं ओळखते. त्यांची कार्यशैली सर्वांना ठाऊक आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या इच्छेप्रमाणे नक्कीच घडेल, असे महत्वपूर्ण आणि सूचक वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले.
काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत पहलगाममध्ये भयंकर हल्ला घडवला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोठी ॲक्शन घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशात एका सांस्कृतिक सोहळ्यात बोलताना राजनाथ यांनी महत्वाचे भाष्य केले. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाची, निर्णयक्षमतेची प्रशंसा केली.
मोदींची निश्चयी आणि धाडसी वृत्ती सर्वांना ज्ञात आहे, असे ते म्हणाले. जवानांसमवेत कार्य करून देशाच्या सीमांच्या रक्षणाची निश्चिती करणे ही संरक्षण मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणे हीसुद्धा माझी जबाबदारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारताने याआधी दहशतवादी हल्ल्यांचा वचपा काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केले.
आता पहलगाम हल्ल्यानंतर तशाच स्वरूपाची धडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या हल्ल्यानंतर मोदींनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यामध्ये संरक्षण आणि गृह मंत्र्यांबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण दलांचे प्रमुखही सहभागी होत आहेत. त्यामुळे यावेळीही काहीतरी घडण्याचे संकेत मिळत आहेत. अशात राजनाथ यांनी सूचक वक्तव्य केल्याने त्याचे महत्व वाढले आहे.





