राजीव गांधी दोनदा नापास झाले? मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर गदारोळ, जाणून घ्या किती शिक्षित होते माजी पंतप्रधान

Mani Shankar Aiyar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अय्यर म्हणत आहेत की, दोनदा नापास झालेल्या व्यक्तीला देशाचे पंतप्रधान कसे बनवण्यात आले?. भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करून प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणाले मणिशंकर अय्यर ?
मणिशंकर अय्यर व्हिडिओमध्ये पुढे म्हणतात, “जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना वाटले, मलाही वाटले की, ते एक एअरलाइन पायलट आहेत, जे दोनदा नापास झाले होते. मी त्यांच्यासोबत केंब्रिजमध्ये शिकत होतो… ते तिथेही नापास झाले, जिथे पास होणे सोपे मानले जात होते. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण तिथेही ते नापास झाले. त्यामुळे असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा प्रश्न मला पडला.
काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य फेटाळले –
हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही, मात्र काँग्रेसने लगेचच मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य फेटाळून लावत राजीव गांधींचा बचाव केला. या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, मणिशंकर अय्यर यांचे राजीव गांधींवरील वक्तव्य निषेधार्ह आहे. कोण कोणत्या काॅलेजमध्ये नापास-पास त्याचा पंतप्रधान किंवा मंत्री होण्याशी काय संबंध? अय्यर यांचे ते वक्तव्य म्हणजे ही त्यांच्या नैराश्येची उंची आहे. काँग्रेस नेते अजय सिंह यादव यांनी अय्यर यांचे वर्णन अप्रासंगिक असल्याचे सांगितले, तर तारिक अन्वर म्हणाले की, राजीव गांधींना त्यांच्या अभ्यासात अडचणी आल्या असल्या तरी त्यांनी राजकारणात उत्कृष्ट काम केले आणि पंतप्रधान असताना देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले.
राजीव गांधी यांनी कुठे शिक्षण घेतले?
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. त्यांचे बालपण आजोबा आणि आई इंदिरा गांधी यांच्यासोबत दिल्लीतील तीन मूर्ती हाऊसमध्ये गेले. त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण डेहराडूनमधील वेल्हॅम प्रेप स्कूल आणि नंतर दून स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी ते ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज आणि नंतर इंपीरियल कॉलेज, लंडन येथे गेले, जिथे त्यांनी मेकॅनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबमधून व्यावसायिक वैमानिकाचा (कमर्शिअल पायलट) परवाना मिळवला आणि नंतर इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट झाले. त्यांना उड्डाणाची विशेष आवड होती.
आत्मघातकी हल्ल्यात झाला मृत्यू –
1980 मध्ये त्यांचे भाऊ संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, आई इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून राजीव गांधींनी अनिच्छेने राजकारणात प्रवेश केला. अमेठीतून लोकसभा निवडणूक जिंकून ते खासदार झाले. नंतर त्यांना काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आले. 1982 च्या आशियाई खेळांच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या आई, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. त्याच दिवशी राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि 2 डिसेंबर 1989 पर्यंत या पदावर राहिले. ते 1991 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राहिले, परंतु निवडणूक प्रचारादरम्यान एलटीटीईच्या आत्मघाती बॉम्बरने त्यांची हत्या केली.





