Rajgad News – एकीकडे वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच, वेल्हे (राजगड) तालुक्यात निसर्गाचा एक दाहक अवतार पाहायला मिळाला. बुधवारी (दि. १८) झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने राजगड परिसराला झोडपून काढले. निसर्गाचा हा अवकाळी वाराने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस सुमारे तासभर चालला. यामुळे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्या-नाल्यांना पाणी आले. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या या भागात क्षणार्धात पाणीच पाणी झाले. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. राजगड तालुक्यात यावर्षी आंबा पिकाकडून मोठ्या आशा होत्या, मात्र आजच्या वादळी पावसाने, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचा मोहर आणि कैऱ्या जमिनीवर पडल्या आहेत. यासह भाजीपाला आणि इतर उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आंबा बागांसाठी कर्ज घेतले होते, जे आता फेडणे कठीण झाले आहे. पर्यटकांसाठी हा पाऊस सुखावणारा आणि ‘इन्स्टाग्राम रील’ बनवण्यासाठी आनंददायी ठरला असला, तरी स्थानिक शेतकऱ्यांसाठी तो डोळ्यांत पाणी आणणारा ठरला आहे. कडाक्याच्या उन्हात अचानक येणारा असा पाऊस हवामान बदलाचा गंभीर संकेत असून, याचा थेट फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत आहे. दरवर्षी होणाऱ्या या अवकाळीच्या संकटावर आता केवळ ‘पंचनाम्यांचे’ सोपस्कार पार पाडून चालणार नाही. प्रशासनाने तात्काळ पीक विम्याची ठोस अंमलबजावणी करून बाधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळवून देणे ही गरज आहे. “निसर्गाने तर साथ सोडली, आता तरी सरकारने हात द्यावा,” अशी आर्त हाक राजगड परिसरातील बळीराजा देत आहे.