Rajan Salvi : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवी यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या नाराजीनाट्य सुरू आहे. उद्धव ठाकरेंना कोकणात धक्का बसणार अशी चर्चा आहे. रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे. अशामध्ये शनिवारी राजन साळवी यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मातोश्रीवर झालेल्या या भेटीनंतर काय चर्चा? याबद्दल त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर माहिती दिली. ते म्हणाले की, मतदारसंघात ज्या घटना घडल्या त्या सर्व त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. आम्ही आमची बाजू त्यांच्यासमोर मांडली आहे, त्यावर आता उद्धव ठाकरे योग्य ते निर्णय घेतील, अशी आमची अपेक्षा आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
राजन साळवी म्हणाले, 2006 मध्ये पोटनिवडणुकीत झालेला पराभव आणि 2024 मध्ये विधानसभेत झालेला पराभव यामध्ये फरक आहे. 2024मध्ये झालेल्या पराभवानंतर लोकांनी आपल्या भावना मला सांगितल्या, त्या पराभवाला कारणीभूत जो घटनाक्रम घडला, त्याबद्दल मी नाराज होतो आणि नाराज आहे. त्याबद्दल मी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या आहेत, असे म्हणत त्यांनी सूचक विधान केले.
काही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की, राजन साळवी यांनी भाजपसोबत जावे, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली असतील, या सर्व माहितीचा सारांश आणि संपूर्ण घटनाक्रम शिवसेना पक्ष प्रमुखाकडे मांडला आहे. त्यांनी हे सर्व भावना ऐकून घेतल्या आहेत. माझ्या मनातील जे दुःख होतं ते मी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे.





