त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा: ‘हिंदी सक्ती केली तर….’
मिरा भाईंदर, : महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रांतर्गत हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मिरा भाईंदर येथे आज झालेल्या जाहीर सभेत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत म्हटले, “हिंदी सक्तीची करणार म्हणजे करणार, असं म्हणता? मग सरकारला आत्महत्या करायची असेल तर करा. पण, महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा फक्त प्रयत्न तरी करुन बघा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू!”
मराठी-हिंदी वादाची पार्श्वभूमी –
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पडसाद उमटत आहेत. मिरा भाईंदर येथील जोधपूर स्वीट अँड नमकीन दुकानाच्या मालकाला मराठी न बोलल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर मराठी आणि अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चांमुळे वाद चिघळला. ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येत मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पाठिंबा दिला, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल –
मिरा रोड येथील सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतो? कोणाच्या दबावाखाली काम करत आहात? केंद्र सरकारचा हा दबाव काँग्रेसच्या काळापासून आहे,” असा आरोप त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा दाखला देत ते म्हणाले, “मुंबईवर गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा डोळा आहे. आचार्य अत्रेंच्या पुस्तकातून मला कळलं, मोरारजी देसाईंनी मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या. हिंदी सक्ती हा मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे. पण, मराठी माणूस जिवंत आहे, हे आम्ही दाखवून देऊ!”
स्वीट मार्ट बंद, पोलिसांचा कडक बंदोबस्त –
राज ठाकरे यांच्या मिरा भाईंदर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोधपूर स्वीट अँड नमकीन दुकानाचा मालकाने दुपारनंतर दुकान बंद ठेवले. राज ठाकरे यांच्या सभेचे ठिकाण या दुकानापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर होते. त्यांच्या आगमनापूर्वी बालाजी कॉर्नर चौकात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत झाले. खबरदारी म्हणून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
त्रिभाषा सूत्राचा वाद –
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शालेय अभ्यासक्रमात सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतला होता. याला राज ठाकरे यांनी “मराठी भाषा आणि संस्कृतीवर हल्ला” ठरवत तीव्र विरोध केला आहे. यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटनांमुळेही वाद वाढला आहे.
मराठी अस्मिता: मराठी माणसाची एकजूट –
मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि ठाकरे बंधूंची एकजूट यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा तीव्र झाला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला आव्हान देत म्हटले, “हिंदीच्या सक्तीविरोधात मराठी माणूस शांत बसणार नाही.” यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय नव्याने गठित समितीच्या अहवालावर अवलंबून असेल, असे स्पष्ट केले आहे.





