Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या (Raj Thackeray) आज स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक वर्धापनदिनानिमित्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक खास कार्यक्रम पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या आशीर्वादाने पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला औपचारिक सुरुवात केली. दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन हॉल किंवा बंदिस्त जागेत साजरा केला जातो, जिथे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र यंदा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वेगळी रणनीती अवलंबली. त्यांनी सांगितले की, ९ मार्च हा वर्धापन दिन असून १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मेळाव्याची तारीख आहे. “म्हणून मी ठरवले की, जे काही बोलायचे ते १९ तारखेलाच बोलून टाकू. ९ तारखेला फक्त सदस्य नोंदणी सुरू करूया,” असे ते म्हणाले. Raj Thackeray Raj Thackeray कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “पक्ष सदस्य नोंदणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज वर्धापनदिनी आम्ही ती अधिक जोमाने पुढे नेतो. माझे सर्व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, नुसते सदस्य नाही व्हायचे तर सक्रिय सदस्य व्हायचे आहे. शाळा, कॉलेज, मंदिर, बाजारपेठ अशा वर्दळीच्या ठिकाणी मनसे सदस्य नोंदणीचे स्टॉल लावले पाहिजेत. लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. हजारो लोकांना आपल्या पक्षात यायचे आहे. त्यांना सक्रिय सदस्य बनवा.” त्यांनी पुढे म्हटले, “आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरून ही नोंदणी सुरू करतो. महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही संपूर्ण राज्यभर जा. १९ मार्चला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी येऊन शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) उपस्थित राहा. २० वर्षांपूर्वी माझी पहिली सभा १९ मार्चलाच झाली होती. आज २० वर्षांनंतर गुढीपाडव्याच्या सभेला हीच तारीख येणे हा योगायोग आहे. सर्व मनसैनिकांनी १९ मार्चला येऊन हजेरी लावावी.” या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी राजकीय भाष्य टाळले आणि ते १९ मार्चच्या गुढीपाडवा मेळाव्यात करणार असल्याचे स्पष्ट केले. रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे आणि शिवराज्याभिषेकाचे साक्षीदार ठिकाण असल्याने या पवित्र भूमीवरून सदस्य नोंदणीला सुरुवात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या निमित्ताने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाच्या विस्तारासाठी ही मोहीम राज्यव्यापी स्वरूपात राबवली जाणार असून, डिजिटल आणि प्रत्यक्ष नोंदणी दोन्ही माध्यमांतून सदस्य वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. २० वर्षांच्या प्रवासात मराठी माणूस आणि मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या मनसेला नव्या ऊर्जेने पुढे नेण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.