हड… कोण पिणार गंगेचे पाणी?, राज ठाकरेंनी उडवली महाकुंभमेळ्याची खिल्ली, म्हणाले…
Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभमेळा आणि गंगा नंदीच्या पाण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मनसेचा 19वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी करत विविध विषयांवर भाष्य केले.
गंगा नदीचे पाणी कोण पिणार? असा सवाल करत राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील गंगा स्नानाची खिल्ली उडवली. तसेच, महाकुंभ मेळ्याला गेलेल्या कार्यकर्त्यांवर देखील निशाणा साधला. यावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना राज ठाकरेंनी महाकुंभ आणि गंगा नदीच्या पाण्यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, काही पदाधिकारी कुंभमेळ्याला गेले होते. मी त्यांना विचारले आल्यावर आंघोळ केली ना? बाळा नांदगावकर यांनी छोट्याशा कमंडलूमध्ये गंगेचे पाणी आणले होते. त्यावर मी हड्ड.. हे पाणी पिणार नाही, असे म्हटले. सोशल मीडियावर पाहतोय लोक तिकडं आघोळ करतात.
‘बाळा नांदगावकर येऊन म्हणत आहेत की हे घ्या गंगेचे पाणी. कोण पिणार ते पाणी? आताच कोरोना गेलाय. दोन वर्षे तोंडाला फडकी बांधून फिरले आणि आता तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत.’, त्यांच्या या वक्तव्यानंतर एक हश्या पिकला.
‘लोकांना वाटले की गंगा आहे तर आम्ही पण आंघोळ करतो. पण नदी काही स्वच्छ झाली नाही. राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून नदी स्वच्छ होणार असल्याचे सांगत आहेत. एकही नदी स्वच्छ नाही. तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. परदेशात नदी स्वच्छ आहे तेथील लोक नदीला माता मानत नाही’, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचा देखील सल्ला दिला.
दरम्यान, मनसेचा आज 19 स्थापना दिन आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड मध्ये पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षप्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले.




