मुंबई – राज्यात 1 जूनपासून सुरू झालेल्या मान्सूनमध्ये घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यत एकूण 104 जणांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत दोन मृत्यूची नोंद झाली असून यात जळगाव आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच आठवडाभराच्या मुसळधार पावसानंतर मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे.
राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमशान घातले आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र, गेल्या 24 तासांत पुरामुळे राज्यात कोठेही कोणाचेही स्थलांतर झाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली असून तीन लोक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मुंबई आणि लगतच्या भागांसह राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, असे त्यात म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 20.1 मिमी पाऊस झाला असून, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
याशिवाय चिपळूणजवळील परशुराम घाट विभागात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक या महिन्याच्या सुरुवातीला वळवण्यात आली होती. गडचिरोली जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 20 मिमी पाऊस झाली असून गोदावरी आणि इंद्रावती नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.