Rain Alert : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; मान्सून केरळमध्ये पोहचला
Rain Alert : हवामान विभागाने शुक्रवारी अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, या भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Rain Alert : देशभरातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या नैऋत्य मान्सूनचे गुरुवारी अखेर केरळमध्ये आगमन झाले. भारतीय हवामान विभागाने (IMD) याबाबत अधिकृत घोषणा केली असून, आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत सध्या मान्सूनपूर्व पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होत असून, कोकणातही मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात मान्सूनचे आगमन कधी?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरणीय परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्राच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचं सर्व चित्र झालं स्पष्ट; तब्बल ‘इतके’ उमेदवार बिनविरोध
गतवर्षी मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर २५ मे रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि २६ मे रोजी मुंबईत त्याचे आगमन झाले होते. यंदा मात्र मान्सून सरासरी वेळेपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने केरळमध्ये पोहोचला आहे.
शुक्रवारी कुठे ‘ऑरेंज’ आणि कुठे ‘यलो’ अलर्ट?
हवामान विभागाने शुक्रवारी अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, या भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उष्णतेपासून दिलासा –
राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या वादळी पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळत आहे. आगामी काही दिवसांत मान्सूनच्या आगमनाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष हवामानाच्या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.





