राज्यातील विधानसभा निकालानंतर पहिला पक्ष बदल ; ‘हा’ नेता ‘तुतारी’ सोडून हाती बांधणार ‘घड्याळ’

Rahul Jagtap । राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून फक्त १० दिवस झाले आहेत. एकीकडॆ राज्यात सत्तास्थापनेचा दावा महायुतीकडून करण्यात येत नाही तर दुसरीकडे निवडणुकीवेळी झालेले पक्षबदलीचा फेरा पुन्हा एकदा होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांनी मोठ्या संख्येने एंट्री केली होती. मात्र निवडणुकीत पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. याच अपयशामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून काही नेत्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील माजी आमदार राहुल जगताप यांचे नाव समोर आले आहे. जगताप हे लवकरच पक्षाला रामराम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभेवेळी राहुल जगताप यांची बंडखोरी Rahul Jagtap ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरही राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र, ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सुटली. ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी केली होती. माझी उमेदवारी मुंबईवरून नाही तर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने ठरवली आहे. यामुळे मी जनतेचे ऐकणार व अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे. निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला जनतेतून संधी मिळेल असा मला विश्वास व्यक्त करत राहुल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
राहुल जगताप अजित पवारांचे घड्याळ हाती बांधणार Rahul Jagtap ।
जगताप यांच्या बंडखोरीमुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीचा अनुराधा नागवडे आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी बाजी मारली. आता विधानसभेच्या निकालानंतर बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. राहुल जगताप हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





