Rahul Gandhi : “हवेच्या प्रदूषणामुळे सामान्य जनतेला मोठी किंमत मोजावी लागते..”; राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता
देशातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी तीव्र चिंता व्यक्त केली आहे

Rahul Gandhi । air pollution – देशातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हवेच्या प्रदूषणामुळे आज सामान्य जनतेला आपल्या आरोग्याची आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी किंमत मोजावी लागत आहे, अशा शब्दांत त्यांनी या गंभीर संकटाकडे लक्ष वेधले.
या समस्येचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्धांना बसत असून, याविरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून जनतेला या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले की, कोट्यवधी भारतीयांच्या दैनंदिन जीवनावर प्रदूषणाचे सावट असून, यामुळे केवळ आरोग्यच नव्हे तर लोकांची उपजीविका देखील धोक्यात आली आहे. विशेषतः बांधकाम मजूर आणि हातावर पोट असलेल्या दैनंदिन मजुरांच्या कामावर याचा विपरीत परिणाम होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
दरवर्षी हिवाळा संपला की प्रदूषणाचा प्रश्न विसरला जातो, या प्रवृत्तीवरही त्यांनी बोट ठेवले. ही समस्या केवळ पुढच्या हिवाळ्यापर्यंत विसरून चालणार नाही. बदलासाठी पहिले पाऊल म्हणजे आपला आवाज बुलंद करणे हे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात राहुल गांधी यांनी नागरिकांना त्यांच्या समस्या आणि अनुभव मांडण्यासाठी आवाज भारताची या संकेतस्थळाचा दुवा शेअर केला असून, लोकांच्या समस्या संसदेत मांडणे हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही बातमी नक्की वाचा…
अक्खा महाराष्ट्र सुन्न…! लोकलमध्येच प्राध्यापकाला संपवलं; क्षुल्लक वादातून भरगर्दीत रक्ताचा सडा






