Rahul Gandhi : विशेष अधिवेशनाच्या मागणीवर विरोधक ठाम; राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पाठवणार पत्र

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. त्या मागणीचे पत्र केंद्र सरकारकडे सादर केले जाणार आहे. उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संबंधित माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पत्र सादर करण्याची प्रक्रिया होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत भयंकर हल्ला घडवला. त्या हल्ल्यामुळे सुरक्षाविषयक त्रुटी समोर आली. दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची स्थिती उद्भवली. त्या संघर्षाला विराम देण्यासाठी दोन्ही देशांत समझोता झाला.
त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. त्या सर्व बाबींवर बोट ठेऊन विरोधक केंद्र सरकारला काही प्रश्न विचारत आहेत. त्यातून विशेष अधिवेशनाचा आग्रह त्यांनी कायम ठेवला आहे. मात्र, सरकारकडून अद्याप विरोधकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.





