महुवा – भारतीय जनता पक्षाचे सरकार आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेला सुट्टी घेऊन गुजरातच्या प्रसारासाठी आले आहेत. त्यांची पहिली सभा आज महुवा येथे झाली. हा आदिवासींचा भाग मानला जातो.
आदिवासी हेच देशाचे पहिले मालक असून त्यांनी कायम जंगलातच राहावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी ते आदिवासींना वनवासी असे संबोधत असतात, अशी टीकाही त्यांनी केली.
ते म्हणाले की, आज देशीतील सर्वच घटक भाजपच्या राजवटीमुळे पोळला गेला असून या घटकांची दु:खे आणि वेदना आपल्याला भारत जोडो यात्रेच्यावेळी ऐकायला मिळतात. या यात्रेत मी शेतकरी, युवक आणि आदिवासींची भेट घेतल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांच्या वेदना जाणवल्या, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.
आदिवासींना उद्देशून ते म्हणाले की, ते तुम्हाला “वनवासी’ म्हणतात. तुम्ही भारताचे पहिले मालक आहात, असे ते म्हणत नाहीत, तुम्ही शहरात राहावे असे त्यांना वाटत नाही, त्यांना ते नको आहे. तुमची मुलं इंजिनिअर, डॉक्टर बनतील, विमानं उडवायला शिकतील, इंग्रजी बोलायला शिकतील हे त्यांना नको आहे असे राहुल गांधी यांनी नमूद केले.
Gujarat Assembly Election 2022 : भारत जोडो यात्रेवर मोदींची टीका, म्हणाले “जे खूप पूर्वीच सत्तेतून…”
जंगल संपत्तीवर आदिवासींची अधिकार आहे. पण तुमच्या ताब्यातून ते जंगलही हिरावून घेत आहेत. हे असेच चालू राहिले तर आणखी पाच ते दहा वर्षात सर्व जंगल त्यांच्या ताब्यात जाणार आहे. दोन-तीन उद्योगपती साऱ्या जंगल भागावरही कब्जा करतील. तुम्हाला राहायलाही जागा मिळणार नाही, तुमच्या मुलांना शिक्षण, आरोग्य आणि नोकऱ्या मिळणार नाहीत, असे ते म्हणाले.