मुंबई – आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी (Raj thackeray) पत्रकार परिषद घेऊन टोल नाक्यासंदर्भातील (Toll) आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला आहे.ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यांवर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे. पनवेल टोलनाक्यासह मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर मनसे पदाधिकारी पोहोचले. यावेळी त्यांनी येणाऱ्या प्रत्येक छोट्या वाहनांना सोडण्यास सुरुवात केली.टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना आडवले असता मनसे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ दाखवायला सुरुवात केली.व्हडिओमध्ये आम्ही छोट्या वाहनांना टोल माफी केलेली असल्याचे वक्तव्य फडणवीस करत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत टोलनाक्यावर गाड्या सोडण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. आम्ही आंदोलन केलं नाही. आम्ही जनजागृती करत आहोत. जनजागृती करण्याचा आम्हाला अधिकार आहे. हवं तर आम्हाला उचलून न्या. माझी अटक कायद्यात बसत नाही. असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले. राज ठाकरेंनी उपस्थित केले सवाल टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये आहे. हा पैसा जातो कुठे? याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येतात”, असे काही सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.