नवी दिल्ली – पंजाबमध्ये सरकारी फायली राघव चढ्ढाच तपासत असून मुख्यमंत्री असलेले भगवंत मान केवळ त्यावर स्वाक्षरी करण्याचे काम करत आहेत. आम आदमी पक्षाच्या या सरकारचे केवळ सहा महिन्यांतच पतन सुरू झाले आहे अशी टीका पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.
“रिमोट कंट्रोलवर चालणारे नसाल तर राहुल…”; भाजपचे मल्लिकार्जुन खर्गे यांना आव्हान
सगळ्या सरकारी फायली राघव चढ्ढाच पाहत आहेत. सहा महिन्यांतच यांचा डाउनफॉल सुरू झाला आहे. आता तर गावांमधील लोकही म्हणू लागले आहेत की हे सरकार चालणार नाही. पंजाबमध्ये त्यांचे काहीच भवितव्य नसून त्याची अनेक कारणे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर गेली आहे. गॅंगस्टर, अमली पदार्थाचा व्यापार, पाकिस्तानकडून येणारा दहशतवाद या सगळ्या बाबी राज्यात परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. हे सगळे प्रकार समोर येत असतात.
माझे सरकार होते त्याकाळीही या गोष्टी सुरू झाल्या होत्या. मात्र अत्यंत कठोपणे त्यांचा बीमोड करण्यात आला. मात्र आता कोणतीच सक्ती नाही. ज्याला जे वाटेल त्याने ते करावे. कायदा सुव्यवस्थेला काहीच अडथळा आज झाला नाही असा एकही दिवस हे सरकार आल्यापासून झाला नाही, असे अमरिंदर म्हणाले.
“रिमोट कंट्रोलवर चालणारे नसाल तर राहुल…”; भाजपचे मल्लिकार्जुन खर्गे यांना आव्हान
पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे काही विषय आहेत. ते मार्गी लागलेले नाहीत. काही आर्थिक मुद्दे आहेत तेही संपलेले नाहीत. यांचे बोलणे आणि प्रत्यक्षातील स्थिती यात काही ताळमेळच राहीलेला नाही. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणतात की यंत्रणेत ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही बंद करू आणि त्यातून वाचणारा पैसा जनतेकडे वळवू. मात्र त्यांनी कुठली गळती थांबवली आणि ते पैसे कुठे वापरले ते मला दाखवा असे आव्हान अमरिंदर यांनी दिले. ते म्हणाले की साडेनऊ वर्षे मी पंजाबचा मुख्यमंत्री होतो.
मला पंजाबचे सगळे माहिती आहे. या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात. आम आदमी पक्षाने अगोदर हे सांगावे की सरकार चढ्ढा चालवत आहेत की मान? अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सगळे राघव चढ्ढाच करतोय. मान केवळ सह्या करण्याचे काम करत आहेत. फायली केवळ सह्यांसाठीच त्यांच्याकडे पाठवल्या जातात. भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडते आहे. सहा महिन्यांतच हे घडले आहे. येथील लोक आता भारतीय जनता पार्टीकडे वळू लागले आहेत. निवडणुका येईपर्यंत बरीच स्थिती बदलली आहे. मला राजकारणात 52 वर्षे झाली आहेत. पंजाबची पूर्ण नस मला ठाऊक आहे.