Pune : तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी मिळणार

पुणे : पावसाळा, तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या धान्याची उचल ३१ मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २१ टक्के धान्य गोदामांमधून उचलल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. ग्राहकांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पावसाळा, पूर आदी प्रतिकूल हवामान स्थितीमुळे धान्याची कार्यक्षम वाहतूक आणि साठवणुकीसाठी राज्य, तसेच केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने हे निर्देश दिले आहेत.
लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल ३१ मेपर्यंत करून त्याचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व जिल्ह्यांकडून पूर्ण क्षमतेने अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढवावी.
त्यासाठी थेट वॅगनमधून वाहतूक करावी. सुट्टीच्या अर्थात शनिवारी व रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामांमधून उचल देण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





