Shindodi News : ऊसाला पाणी देत असताना काळाचा घाला; विजेच्या तारेचा धक्का बसून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू, शिंदोडी गावावर शोककळा
Shindodi News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि महावितरणच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे.

Shindodi News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. ऊसाच्या शेतात पाणी देत असताना 11 केव्ही विद्युत वाहिनीची तार तुटून पडल्याने विजेचा धक्का बसून अक्षय ऊर्फ बाळू धुळा हाके (वय 27) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शिंदोडी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. (Shindodi News)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 14) दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास अक्षय हाके हा घरालगतच्या ऊसाच्या शेतात पाणी देण्याचे काम करत होता. त्याचवेळी शेताशेजारून जाणाऱ्या महावितरणच्या 11 केव्ही विद्युत वाहिनीची एक तार अचानक तुटून थेट ऊसाच्या शेतात पडली. ऊसाच्या पिकामुळे तार दिसून न आल्याने अक्षयचा त्या तारेशी संपर्क आला आणि विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (Shindodi News)
गावासह परिसरात हळहळ
अक्षय हाके हा शांत, मनमिळावू आणि सुस्वभावी तरुण म्हणून परिसरात ओळखला जात होता. त्याला क्रिकेटची विशेष आवड होती. त्यामुळे शिंदोडीसह परिसरातील अनेक गावांमध्ये त्याचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या अकाली निधनाची बातमी समजताच गावात शोककळा पसरली. अनेक मित्रांनी सोशल मीडियावर त्याच्या क्रिकेटच्या आठवणींचे व्हिडिओ शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली. (Shindodi News)
हाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अक्षयच्या वडिलांचेही निधन त्याच्या लहानपणीच झाले होते. त्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याच्या आईने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. मात्र आता अक्षयच्या अकाली निधनामुळे हाके कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, चुलते आणि चुलत भाऊ असा परिवार आहे. (Shindodi News)
जीर्ण विद्युत वाहिन्या बदलण्याची मागणी
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, या भागातील 11 केव्ही विद्युत वाहिनीचे काम सुमारे 1975-76 च्या काळात झाले असून, त्यावरील तारा आणि खांब अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. याच जीर्ण तारा तुटल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या भागातील जुन्या विद्युत तारा आणि खांब तातडीने बदलण्यात यावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी महावितरणकडे केली आहे. (Shindodi News)





