पुणे ग्रामीण : हिंगणेवाडी येथील पाणी शुद्धीकरण साठवण तलावावरून ग्रामस्थ संतप्त.. झाडे तोडण्याचे काम पाडले बंद

पुणे – इंदापूर ( गोकुळ टांकसाळे ) – येथील ग्रामपंचायतिच्या हद्दीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याकरिता केंद्रशासन व राज्य शासनाच्या माध्यमातून हिंगणेवाडी येथे पाणी शुद्धीकरणासाठी साठवण तलावाची निर्मिती करण्याचे काम सध्या सुरू आहे.हे काम आज नागरिकांनी संतप्त भूमिका घेत बंद पाडले.
शासनाच्यावतीने सुरू असलेले जलजीवन मिशनचे हे काम 54 कोटी रुपयांचे असून हा निधी वेगवेगळ्या स्तरावर खर्च होणार आहे. भवानीनगर येथे विहीर खोदून पाईपलाईन द्वारे या विहिरीतील पाणी हिंगणेवाडी येथील साठवण तलावामध्ये सोडून येथून पाणी शुद्ध करून पुन्हा सणसर ग्रामपंचायतच्या हद्दीतील सणसर, भवानीनगर ,अशोक नगर, रायते मळा, गंगोत्रीनगर यासह सर्व वाड्या वस्त्यांवर हे पाणी पोहोचविण्यात येणार आहे. मात्र साठवण तलावाला विरोध होत असल्याने ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अमरसिंह कदम, सणसरचे माजी उपसरपंच संतोष चव्हाण, माजी सदस्य श्रीनिवास कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांच म्हणणं काय ?
योजना अमलात आणत असताना विहिरीसाठी निवडलेली जागा चुकीची आहे छत्रपती कारखान्याच्या जवळील या विहिरीमध्ये रसायन मिश्रित पाणी उतरत असल्याने ते धोकादायक ठरणार आहे.वृक्षतोड करून हा साठवून तलाव करण्यात येत असल्याने त्याला विरोध आहे यामध्ये बाभळीची लिंबाची झाडे विनापरवानगी चोरली जात असल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे
भवानीनगर वरून इतक्या लांब हिंगणेवाडी येथे पाणी आणायचं आणि परत पाणी शुद्ध करून ते पाणी भवानीनगरच्या परिसरात पोहोचवायचं हे न उलगडणार कोड आहे.शासनाचा निधीचा अपव्यय करणार हे पाण्याचं तळ नसून भ्रष्टाचाराचं खळ आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.
योजनेतील साठवण तलाव हा ओढ्याच्या कडेला असल्याने पुराच्या पाण्याचा तडाखाही गावाला बसणार आहे.एकदा ही चुकीची योजना झाली तर किमान 30 ते 40 वर्ष परत कोणतीही योजना मिळणार नाही.





