पुणे-ग्रामीण भागातील 11 मार्गांवर पीएमपीची सेवा बंद झाल्याने या भागातून शहरात येणारे विद्यार्थी, कामगार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी पीएमपी प्रशासनाकडे होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात एसटी प्रशासनाशी चर्चा करून या मार्गांवर एसटीच्या वेळांव्यतिरिक्त तसेच गर्दीच्या वेळी काही बस सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
एसटीच्या संपाच्या काळात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पीएमपीकडून 78 मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आता एसटीने त्यातील 40 मार्गांवरील बस सेवा बंद करण्याचे पत्र पीएमपीला दिले आहे. त्यामुळे पीएमपीकडून नुकतीच 11 मार्गांवरील बस सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पीएमपी तसेच प्रवाशांचे नुकसान होऊ न देता कशा प्रकारे दिली जाऊ शकते, याचा विचारही केला जाणार असल्याचे बकोरिया म्हणाले. दरम्यान, ही सेवा बंद करण्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
एसटीसोबत चर्चा करून निर्णय
या मार्गांवर एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने पीएमपीकडून या मार्गांवर बस सोडण्यात येत होत्या. मात्र या बसला सकाळी आणि संध्याकाळीच गर्दी होती. तर दुपारी या बस रिकाम्याच धावत असल्याने पीएमपीला आर्थिक फटका बसत आहे. सकाळी शहरात येण्यासाठी आणि संध्याकाळी जाणाऱ्यांसाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल, याची चर्चा करून सेवा सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे.
बंद करण्यात आलेल्या सेवेचा फटका विद्यार्थी आणि कामगार बसणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या 11 मार्गांवर एसटीसी बस संख्या तुलनेने कमी आहे. तर पीएमपीला प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळी या मार्गांवर चांगली गर्दी आहे. त्यामुळे लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल. हे मार्ग सुरू करण्याबाबत प्रवाशांकडूनही पीएमपीकडे मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे.
– ओम प्रकाश बकोरिया, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी