Pune News – आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये कामाप्रती उत्कटता (पॅशन), चिकाटी आणि आपल्या कर्माचा अभिमान असणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ते केवळ फॅशन म्हणून करू नका, तर पूर्ण निष्ठेने करा,” असा सल्ला जागतिक कीर्तीचे शेफ हेमंत ओबेरॉय यांनी आज दिला. मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) ४४ व्या पदवीदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, एएमआर समूहाचे अध्यक्ष ए. महेशकुमार रेड्डी, विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. श्रीकुमार, कुलगुरू डॉ. गीताली टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उपाध्यक्षा डॉ. प्रणति टिळक, विश्वस्त सरिता साठे, निखिल मराठे, प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यासह विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख, अधिष्ठाता उपस्थित होते. यावेळी डॉ. सावंत, ओबेरॉय आणि रेड्डी यांना सन्माननीय डी.लिट (विद्यानिधी) पदवी देऊन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाला मोठी संधी प्राप्त झाली आहे. गोव्यात आम्ही स्वयंपूर्ण गोवा मोहिमेद्वारे तरुणांना कौशल्याचे प्रशिक्षण दिले. याचा परिणाम आज पर्यटन क्षेत्रात दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रातही क्षमतेचा वापर करावा. शेफ हेमंत ओबेरॉय यांनी टाटा समूहातील आपल्या ४२ वर्षांच्या अनुभवाचा दाखला देत प्रामाणिकपणा आणि कामातील नीतिमत्ता हाच यशाचा खरा मार्ग असल्याचे स्पष्ट केले. भारतात २५ हजार प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात, जे इतर कोणत्याही देशात नाहीत. त्यामुळे भारतीय असल्याचा अभिमान बाळगून भारतीय खाद्यसंस्कृती जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ए. महेशकुमार रेड्डी यांनी भारतातील संसाधनांचा वापर करून देशासाठी काम करण्याची गरज व्यक्त केली. परदेशात जाण्यापेक्षा भारतात राहूनच मोठी प्रगती साधता येते, असे त्यांनी नमूद केले.