Pune News : शहराचा मलनिस्सारण प्रश्न सुटणार ; केंद्राकडून ३३२ कोटींच्या निधीला मंजुरी – मुरलीधर मोहोळ यांची माहिती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेत समाविष्ट २३ गावांसाठी केंद्र सरकारकडून ३३२ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील नदी प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.सिंहगड रस्ता परिसरातील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कार्यक्रमात ते बोलत होते.
पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेला हा मोहोळ यांचा सलग १२ वा जनता दरबार होता. या वेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोहोळ म्हणाले, की अमृत २.० योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पाची एकूण किंमत १,४३७.९४ कोटी रुपये आहे. त्यापैकी ५३३.८५ कोटी रुपयांची कामे आधीच मंजूर झाली असून, नव्याने ३३२.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्यामुळे कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला, नऱ्हे, जांभुळवाडी, नांदोशी, किरकटवाडी, पिसोळी, सणसनगर, कोंढवे धावडे, भिलारवाडी, सूस, म्हाळुंगे, गुजर निंबाळकरवाडी आणि मंगदेवाडी या गावांमध्ये या कामांची अंमलबजावणी होणार आहे. समाविष्ट गावांमध्ये स्वच्छ व शास्त्रशुद्ध मलनिस्सारण यंत्रणा उपलब्ध होऊन पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण..
सामान्य नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी दोन वेळा हे अभियान राबवण्यात आले. पुढील महिन्यापासून या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याचे मोहोळ यांनी जाहीर केले. अभियानाद्वारे नागरिकांचे प्रश्न सुटत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक पुणेकरांचा सहभाग वाढताना दिसत असल्याचे या वेळी दिसून आले.





