Pune News | खड्ड्यांबाबत आता मुख्यमंत्र्यांचीच तक्रार! रस्त्यांची चाळण, तक्रारींचा पाऊस..महापालिकेच्या कारभारावर फडणवीस नाराज

प्रभात वृत्तसेवा
पुणे : पुण्यातील रस्त्यांची दुर्दशा काही केल्या संपत नाही. मागील वर्षी थेट राष्ट्रपती कार्यालयाने तक्रार करून नाराजी व्यक्त केली असतानाही परिस्थिती मात्र जैसे थेच आहे. महापालिका प्रशासनाने यात जराही सुधारणा केली नाही. अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्यांबाबत तक्रार करून नाराजी दर्शविली आहे. त्यामुळे पथ विभागात मोठी धावपळ सुरू झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधींचा खर्च करून डांबरीकरण, रिसर्फेसिंग आणि पॅचवर्कची कामे केली जातात, असे महापालिका सांगते. मात्र, प्रत्यक्षात पहिला पाऊस झाल्यावर देखील रस्त्यांची चाळण होते. खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी म्हणून खडी टाकली जाते. ती रस्त्यावर पसरते आणि त्यामुळे वाहनांची चाके घसरतात, अपघात होतात आणि पर्यायाने वाहतूक मंदावते. रोड मित्र ॲपवर तक्रारी आल्यावर काही खड्डे बुजविले जातात. मात्र, उर्वरित भागांकडे दुर्लक्षच केले जाते.
पावसाळ्यात हॉटमिक्स प्लांट बंद असल्याचे कारण पुढे केले जाते आणि नागरिकांना नाहक मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो.व्हीआयपी दौरे असतील, तेव्हा मात्र प्रशासन तत्परतेने खड्डे बुजवते, रस्त्यांवर डांबरीकरण करते. मुख्यमंत्री फडणवीस हे दर आठवड्याला पुणे दौऱ्यावर येत असतात. अलीकडच्या दौर्यात त्यांनाच खड्डेमय रस्त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यामुळे त्यांनी तातडीने आयुक्तांकडे तक्रार करून नाराजी व्यक्त केली. संबंधित रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी महापालिकेच्या पथ विभागावर दबाव वाढला आहे. आयुक्तांनीही मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीला दुजोरा दिला आहे.
लोकप्रतिनिधींचे मौन..
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख रस्त्यांसह लहान रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मात्र, आजी- माजी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी याकडे दुर्लक्षच करतात. विरोधकांकडूनही ठोस आंदोलन होत नसल्याने प्रशासनाला मोकळे रान मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नाराजीमुळे आतातरी शहरातील रस्ते सुधारतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





