Pune News : गेल्या काही वर्षांत झालेले पर्यावरणीय बदल, पावसाचे बदललेले स्वरूप यामुळे गेल्या सात-आठ वर्षांत अचानक येणाऱ्या वेगवान पुरांना (फ्लॅश फ्लड) पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. अशा वाढत्या अचानक पुरांमुळे पुण्यात राहणे एक शिक्षा असल्याची भावना नागरिकांची होत आहे. त्यातच पावसाच्या बदलत्या स्वरुपाच्या तुलनेत पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहिन्यांची क्षमता अत्यंत तोकडी असल्याचे दिसून येते. शहरात असलेल्या रस्त्यांच्या तुलनेत पावसाळी वाहिन्यांचे प्रमाण अवघे १३ टक्के आहे. शहरात २४०० किलोमीटर लांबीचे रस्ते असताना पावसाळी वाहिन्या केवळ ३२३ किलोमीटर एवढ्याच अंतराच्या आहेत. त्यातच या वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता प्रतितास ३५ ते ५५ मिमी पावसापुरती मर्यादित आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास शहराच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होते आणि नागरिकांना आपले जगणे नकोसे होते. या पुरामुळे प्राणहानी होण्याबरोबर मालमत्तेचेही मोठे नुकसान होते. अलीकडच्या काळात कमी वेळेत ढगफुटीसदृश पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या वेगाने येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी वाहिन्यांचे प्रमाण किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमिवर प्रत्यक्षात दरवर्षी केवळ १ ते २ किलोमीटर नवीन वाहिन्या टाकल्या जात आहेत. परिणामी, भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिका १३ टक्के वाहिन्या महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे पालिकेची हद्द ५१८ चौरस किलोमीटरपर्यंत वाढली आहे. शहराच्या जुन्या भागाचा आकार बशीसारखा असल्याने मध्यवर्ती भाग सखल आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या मध्यभागी साचते.शहरातील रस्त्यांची लांबी सुमारे २४०० किलोमीटर असून पावसाळी वाहिन्यांचे जाळे केवळ ३२३ किलोमीटर एवढे आहे. अनेक मुख्य रस्त्यांवर जागेअभावी वाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. तसेच अस्तित्वातील वाहिन्या २० ते २५ वर्षे जुन्या असल्याने त्यांची क्षमता केवळ प्रतितास ३० ते ५५ मिमी पाऊस वाहून नेण्याएवढी आहे.परिणामी, थोडा जरी जास्त पाऊस झाला तर रस्त्यांवर पाणी साचते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्याची सुविधा नसल्याने ते दीर्घकाळ साचून राहते. याशिवाय, काही ठिकाणी पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेज वाहिन्या एकमेकांना जोडल्या गेल्याने दोन्ही ठिकाणचे पाणी एकत्र येऊन चेंबरमधून घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. काय आहेत निकष? गेल्या दशकात पावसाच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सेंट्रल पब्लिक हेल्थ अँड इंजिनिअरिंग अँड एन्व्हायर्नमेंटल ऑर्गनायझेशन (सीपीएचईओ) ने पावसाळी वाहिन्यांसाठी निकष निश्चित केले आहेत. या निकषांनुसार पावसाळी वाहिन्यांची क्षमता प्रतितास ११६ मिमी पावसाचा निचरा करण्याइतपत असावी, म्हणजेच वाहिन्यांचा व्यास १२०० मिमी असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील बहुतांश पावसाळी वाहिन्यांचा व्यास केवळ ६०० मिमी एवढाच आहे. त्यामुळे वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सध्याची यंत्रणा अपुरी ठरत आहे. “केंद्र शासनाच्या सीपीएचईओ निकषानुसार पावसाळी वाहिन्यांची क्षमता प्रतितास ११६ मिमी पावसाचा निचरा करण्याइतकी असणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेची सध्याची क्षमता केवळ ३५ ते ५५ मिमी पावसापुरतीच आहे. त्यामुळे शहरासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असून त्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.” – नवल किशोर राम (महापालिका आयुक्त)