Pune Nashik railway: पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जुन्नर तालुक्यातूनच जावा; ओतूर येथे सर्वपक्षीय बैठकीत तीव्र मागणी

प्रभात वृत्तसेवा
ओतूर – पुणे-नाशिक रेल्वेमार्ग बदलल्यामुळे ही रेल्वे जुन्नर तालुका सोडून जाऊ नये, अशी सर्वसमावेशक भूमिका जुन्नर तालुकावासीयांनी घेतली आहे. याकरिता ओतूर (ता. जुन्नर) येथे सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे रामदास डुंबरे होते.
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग बदलण्याविरोधात जनआंदोलन छेडण्याची सुरुवात ओतूर आणि परिसरातून झाली आहे.यावेळी सरपंच डॉ. छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, मोहित ढमाले, विशाल तांबे, विनायक तांबे, तुषार थोरात, दिलीप डुंबरे, तानाजी तांबे, प्रांजल भाटे,
अक्षदा पानसरे, महादेव ओतूरकर, दत्तात्रय डुंबरे, शोभा डुंबरे, दिलीप घोलप, भिवसेन माळवे, सीताराम ढमाले, पांडुरंग अहिनवे, अनुराग फापाळे, अरुण वाकचौरे, अनिल डुंबरे, शुभम पानसरे, पांडुरंग ढोबळे यांसह शेतकरी उपस्थित होते.जुन्नर तालुका कृषीप्रधान असल्याने तालुक्यातून रेल्वेमार्ग झाल्यास येथील शेतकऱ्यांना शेतीमालाचा योग्य बाजारभाव मिळू शकतो.
तसेच, शहरी भागात उद्योग व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांसाठी या मार्गाने चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, या काळात रेल्वेमार्गाबद्दल निर्णय होणार असल्याने, रेल्वे जुन्नर तालुक्यातूनच व्हावी आणि तिचा मार्ग आधी सर्वेक्षण झाल्यावर ठरल्याप्रमाणे असावा, अशी आग्रही मागणी संसदेत करण्यात यावी, अशी चर्चा या बैठकीत झाली.
या अधिवेशन काळात पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग न बदलता तो जसा होता तसाच ठेवून ही रेल्वे जुन्नर तालुक्यातून जाण्यासाठी आग्रही लक्षवेधी भूमिका घेण्याचा निर्णय झाला आहे. वेळ पडल्यास रस्ता रोकोसारखे जनआंदोलन उभारण्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात आले.
शासनाने जीएमआरटीचे कारण देऊन मार्ग बदलण्याचा घाट घातला असेल, तर याच जीएमआरटीमुळे जर शासकीय औद्योगिक वसाहतसारखे महत्त्वाचे प्रकल्प तालुक्यात होऊ शकले नाहीत, तर हा जीएमआरटी प्रकल्पच नको, अशी भूमिका जमलेल्या नागरिकांनी मांडली.
याकरिता ओतूर ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करण्यात येणार असून, तसे ठराव मागविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि उद्योग व्यवसायात वाढ होण्यासाठी पुणे-नाशिक हा रेल्वे प्रकल्प जुन्नर तालुक्यातूनच जाणे महत्त्वाचे आहे.




