Pune Gramin : शिरूर ते पाबळ मार्गावरील रस्ता क्रमांक १०३ वरील डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निषेधार्थ निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे दि. २ जून पासून ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार संबंधित यंत्रणेकडे तक्रारी करूनही कामाची गुणवत्ता सुधारली गेली नाही. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरलेले साहित्य हे अपुरी टिकाऊ क्षमता असलेले असून, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्ता उखडू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. निलेश वाळुंज यांनी उपोषणादरम्यान सांगितले की, “हा रस्ता जनतेच्या सुरक्षेचा आणि दैनंदिन वाहतुकीचा महत्वाचा मार्ग आहे. पण हे काम अत्यंत हलगर्जीपणे आणि अपारदर्शक पद्धतीने करण्यात आले आहे. जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे.” या उपोषणासाठी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी निलेश वाळुंज यांना पाठिंबा दिला असून दोषी अधिकाऱ्यांवर मोठे ते दारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाची उदासीनता… या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आता उधाण आले असून, निलेश वाळुंज यांच्या उपोषणाला स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली, तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयात हस्तक्षेप करून चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर त्वरित कारवाई झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.