भवानीनगर : वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यामुळे तरुण पिढी आणि देशाचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. अमली पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, अमली पदार्थांच्या सेवनामुळे शेकडो तरुण उद्ध्वस्त झाले असून, भविष्यात तरुणाईला या व्यसनातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान समाजासमोर असेल. पुण्यासारख्या उच्चविद्याविभूषित जिल्ह्यातही अमली पदार्थ विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. जिल्ह्यात होणारे खून, चोरी, दरोडे, अपहरण, टोळीयुद्ध आणि वेगवेगळ्या शर्यतींदरम्यान होणारे वाद यांमागे अमली पदार्थांचे सेवन हेच मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. नशा करून गुन्हे करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यकर्त्यांना तरुण पिढी बिघडवायचीच आहे, मात्र पोलिसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या आपल्या ब्रीदवाक्याचे स्मरण ठेवून खाक्या दाखवावा आणि ड्रग्जचे समूळ उच्चाटन करावे; अन्यथा उद्या तुमची मुलेही याचा बळी पडतील,” असे आवाहन कदम यांनी केले. या संदर्भात महिन्याभरात ठोस कारवाई झाली नाही, तर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांचा विराट मोर्चा जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा अमरसिंह कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. हप्तेखोरीमुळे पोलिसांचे दुर्लक्ष? शहरांमधील आणि ग्रामीण भागातील अमली पदार्थ विक्रीची पाळेमुळे पोलीस यंत्रणेला पूर्णपणे ठाऊक आहेत. मात्र, संबंधित घटकांकडून मिळणारे हप्ते आणि वरकमाई थेट वरपर्यंत जात असल्यामुळे पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा जनतेचा समज झाला आहे, असा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. हेही वाचा : Pune District : अतिक्रमणावर कारवाई की पुन्हा तडजोड? प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष