अभिमानास्पद! लातूरची ‘ही’ एनजीओ दत्तक घेणार जनरल बिपिन रावत यांचे वडिलोपार्जित गाव; सर्व स्तरातून होतंय कौतूक

नवी दिल्ली : महिन्याच्या सुरुवातीलाच देशाला हादरून सोडणारी घटना घडली. तामिळनाडूमध्ये ८ डिसेंबरला झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे वडिलोपार्जित गाव दत्तक घेण्यासाठी महाराष्ट्रातील एका एनजीओकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या एनजीओच्या कामाचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
लातूरमधील डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानला (HBPP) पौरी गढवाल जिल्हा अधिकाऱ्यांनी सैंज गावात विकास उपक्रम राबविण्याची परवानगी दिली आहे. या गावात योग्य रस्ते नसल्याने गावकऱ्यांना अडचणी येत आहेत. एचबीपीपीचे संस्थापक निवृत्ती यादव यांनी, “ते पुढील आठवड्यात सैंज गावाला भेट देऊन तिथल्या भूभागाची माहिती घेतील आणि तेथील विकास उपक्रमांचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.
निवृत्ती यादव यांनीयाविषयी माहिती देताना, “एचबीपीपी स्वतःच्या संसाधनांचा वापर करून आणि आरोग्य आणि शिक्षण सुविधा उभारण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारची मदत घेईल.” तर, “HBPP द्वारे गाव दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सैंज गावाला भेट देतील आणि तेथे होणार्या विकास उपक्रमांचा आराखडा तयार करतील. ही एनजीओ गावात विकासकामे करण्यास इच्छूक आहे, असे आपण जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवले आहे,” असे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सांगितले.
एचबीपीपीच्या संस्थापकांना जिल्हा दंडाधिकारी विजय कुमार जोगदंडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “तुम्हाला नियमानुसार, पौरी गढवालमधील सैंज या देशाच्या शूर सुपुत्र जनरल बिपिन रावत यांच्या वडिलोपार्जित गावात विकास उपक्रम राबविण्याची परवानगी देण्यात आली आहे.” एचबीपीपी गेल्या १८ वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्यांनी २०१३ च्या केदारनाथ पूर आला होता तेव्हा उत्तराखंडमध्ये मदत सामग्री देखील पाठवली होती.
तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगराळ प्रदेशामध्ये जनरल बिपिन रावत आणि इतर काही जण असलेले हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र, या अपघातात बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह सर्व १४ जणांचा मृत्यू झाला.





