निलेश वाळुंज यांच्यासह आंदोलनकर्ते मोठ्या अपेक्षेने पण….; आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

शिरूर : शिरूर तहसील कार्यालय आवारात आमदाबाद-मलठण या खराब रस्त्याच्या कामाबाबत आणि कोंढण ओढाच्या पुलाच्या चुकीच्या कामाविषयी निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, या आंदोलनाकडे शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट पसरली आहे.
त्यात भर म्हणून दिनांक १२ जून रोजी शिरूर -हवेलीचे आमदार माऊली कटके हे शिरूर शहरात आले होते. त्यांनी शिरूर बसस्थानक येथे लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यानंतर नगर परिषद कार्यालयात आढावा बैठकही घेतली. मात्र, शिरूर शहरात उपस्थित असूनही त्यांनी उपोषण स्थळी येण्याचे टाळले.
निलेश वाळुंज यांच्यासह आंदोलनकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या अपेक्षेने आमदार कटके यांची वाट पाहत होते. मात्र, त्यांच्या या वर्तनाने आंदोलनकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. “आमदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनकर्त्यांच्या व्यथा समजून घेतल्या असत्या, तर संघर्षाची तीव्रता कमी झाली असती. पण त्यांनी मुद्दाम पाठ फिरवली,” असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मते, हे केवळ दुर्लक्ष नसून जनतेच्या भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. आंदोलनाला आता सामाजिक संघटनांबरोबरच युवक आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राजकीय नेत्यांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून लोकांच्या दुःखावर मलम लावणे गरजेचे आहे, असे तीव्र मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. आता प्रश्न उभा राहतो तो आंदोलनकर्त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार का? की ते फक्त लोकार्पण सोहळ्यापुरतेच शिरूरमध्ये दाखल होणार? सत्याग्रहाला पाठिंबा वाढत चालल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक ठरत आहे.





