पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आमदाराकीच्या आपल्या पहिल्या टर्ममध्ये पुणेकरांचे नेतृत्त्व करत असताना शासनदरबारी अनेक प्रश्न मांडले आणि काही प्रश्न सोडवलेही. काही प्रश्न सोडवणे हे शासनाच्याच हाती असतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अनेक प्रश्नांची मांडणी, मागण्या विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. शिरोळे यांना भाजप-महायुतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षांत या भागाचे नेतृत्त्व करताना राज्य सरकारकडे अनेक गोष्टींबाबत पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे केवळ शिवाजीनगर मतदारसंघच नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडेही शिरोळे यांनी सरकारचे लक्ष वेधले. नागरिकांना फिरण्यासाठी आणि विशेषत: मुलांना खेळण्यासाठी शहरातील सरकारी संस्थांची मैदाने उपलब्ध करून द्यावीत. येथील कृषी महाविद्यालय, पोलीस ग्राउंड, औंध आयटीआय, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे ही मैदाने आहेत, असे शिरोळे यांनी सांगितले. मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक सवलतींत भरीव वाढ करावी. आरक्षणाची कायदेशीर लढाई तडीस न्यावी, पुरावे मिळाले असतील त्यांना त्वरीत कुणबी दाखले द्यावेत, जेणेकरून त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मदत होईल, अशी मागणीही शिरोळे यांनी विधानसभेत केली होती. अॉनलाइन फसवणुकीच्या प्रकारांना गांभार्याने घेऊन, सायबर सेलतर्फे या सगळ्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये विशेषत्वाने वीजबिलाच्या खोट्या मेसेजेसचा प्रश्न शिरोळे यांनी विधानसभेत उपस्थित केला. वाळू माफियांवर पोलिसांनी सक्त पाऊल उचलून त्यांच्यावर शासनाची दहशत बसेल अशी कारवाई करण्याची मागणीही शिरोळे यांनी केली. पुणे शहर हे वेगाने वाढत आहे. शहरभर दुप्पट वेगाने बांधकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रात्री-बेरात्रीच्या वेळेस बांधकामे चालतात. बांधकामासाठीची वाहने, अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना होत असतो. याबाबतच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम कोणत्या वेळेत सुरू ठेवावे तसेच हे काम करताना नागरिकांना काही त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी, अशी नियमावली तयार केलेली नाही असे निदर्शनास आले. तरी पुणे महापालिकेस बांधकाम नियमावली करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही शिरोळे यांनी केली होती. मी केलेल्या कामाची फलश्रुती होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार मिळाला. याचा आनंद आहे. आपण मांडलेल्या नागरी प्रश्नांची ही पोहोचपावती आहे. या पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते. – आमदार सिद्धार्थ शिरोळे, उमेदवार, भाजप, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मुळशी धरणाचे पाणी पुण्याला मिळावे शहरातील पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची कमतरता निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मुळशी धरणातून शहराला पाणी मिळेल का, असा सवाल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सरकारपुढे उपस्थित केला. तसेच हे पाणी मंजूर व्हावे, त्यासाठी प्रयत्नही केले आहेत.