प्रकाश आंबेडकरांची ‘ती’ मागणी मान्य; मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्याला नोटीस

मुंबई – मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचे दिसत आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हिडीओ क्लीप द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी पक्षाने केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली.
दरम्यान, सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिली आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ देण्याचे आदेश या नोटीसमध्ये दिले आहे. तसेच या नोटीसीला 2 आठवड्यात उत्तर द्यावे, असेही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेनंतर झालेले जे मतदान आहे, त्यासंदर्भात असणारा जो स्लीपचा रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्ड आमच्याकडे नाही, असे उत्तर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळाले होते. त्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे की नाही याबाबत विचारणा केली आहे. निवडणूक आयोगाकडे ती माहिती नसेल, तर 6 वाजेनंतर झालेले मतदान झाले की नाही झाले, हा मुद्दा आहे. 6 वाजेनंतरच्या मतदानाची आकडेवारी आहे, ते मतदान झालेलेच नाही, असे आम्ही कोर्टात सांगितले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
निवडणूक आयोग निवडणुका पारदर्शीकपणे पार पाडल्याचा दावा करत असेल, तर तोच त्यांनी कोर्टासमोर करावा आणि त्यांच्याकडे किती स्लीप्स वाटल्या आणि किती वाटल्या नाहीत त्याची माहिती कोर्टासमोर द्यावी, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. निवडणुकीचा निकाल जाहीर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल, तर मग रिटर्निंक ऑफिसरने तो सगळा दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवला पाहिजे. त्यानंतर निवडणूक आयोग जे सांगेल, त्यानुसार तो निकाल दिला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हे सरळ मार्गानं आलेलं सरकार नाही – संजय राऊत
मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिलेल्या नोटीस संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक येथे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘आम्ही सगळे निवडणूक आयोगाकडे वारंवार गेलो. निवडणूक आयोग एकच म्हणत राहिला की ऐसा हो सकता है. अरे कसं होऊ शकतो? 76 लाख? या 76 लाखांची जर साधारण 150 मतदारसंघाप्रमाणे त्याची विभागणी केली तर सरासरी प्रत्येक मतदारसंघात जवळपास 25 ते 30 हजार मतं वाढवली आहे. तर त्याचे प्रत्येक बूथवर 100 ते 200 मतं वाढवली आहेत’.
असा आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी ही सत्ता स्थापन होण्यासाठी पडद्यामागे मोठी पट कथा लिहिल्याचंही म्हटलं. ‘हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार स्थापन होऊ शकलं. हे सरळ मार्गानं आलेलं सरकार नाहीये. यासाठी खूप मोठी पडद्यामागे पटकथा लिहिली गेली आणि अनेक खलनायकांनी त्यात काम केलं. हायकोर्टानं जे विचारलं ते बरोबर आहे. पण जनतासुद्धा तेच विचारते आहे’, असं संजय राऊत म्हणाले.
‘नाशिकमध्ये जे जिंकले त्यांनी आपली विजयी मिरवणूक काढली नाही. त्यांना अजून खात्री नाही की आम्ही जिंकलो आहोत आणि इतक्या लाखा लाखाच्या मतांनी जिंकलो आहोत’, असा चिमटा देखील संजय राऊत यांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांना काढला.
उच्च न्यायालयानं दिलेल्या नोटीसीसंदर्भात ते पुढे म्हणाले की, ‘हायकोर्टाने प्रश्न विचारला आहे. पण या प्रश्नाच्या टोकापर्यंत ते गेले तरच या देशाच्या लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल. कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जो घसरत चालला आहे तो पुन्हा एकदा विश्वास मजबूत होईल’.





