नेहमी आपल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुलींना शिस्त लावण्यासाठी मारहाण करावी आणि ज्या मुली दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत जाण्याचा विचार करतात, त्यांचे पाय तोडून टाकावेत, असे आक्षेपार्ह विधान केले. हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. साध्वी प्रज्ञासिंह यांचे वक्तव्य एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी पालकांना उद्देशून सांगितले की, “ज्या मुली आपल्या पालकांची आज्ञा मोडतात, त्यांचा आदर करत नाहीत आणि घरातून पळून जाण्याचा विचार करतात, त्यांना मारहाण करून सुधारले पाहिजे. पालकांनी आपले मन बळकट करावे. जर तुमची मुलगी तुमचे ऐकत नसेल आणि दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत जाण्याचा विचार करत असेल, तर तिचे पाय तोडून टाका. अशा वेळी तुमचे हात थरथरता कामा नयेत.” त्यांनी पुढे म्हटले की, ज्या मुली संस्कारांचा आदर करत नाहीत, त्यांना अशीच शिक्षा दिली पाहिजे. पालकांना मारहाणीचे आवाहन साध्वी प्रज्ञासिंह यांनी पालकांना मुलींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “ज्या पालक आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी मारहाण करतात, ते बरोबर करतात. मुलांना शिस्त लावण्यासाठी मारहाणीची गरज आहे, यात घाबरण्याचे कारण नाही.” त्यांनी मुलींच्या जन्मावेळी पालकांच्या आनंदाचा उल्लेख करत सांगितले की, “जेव्हा मुलगी जन्मते, तेव्हा पालक तिला लक्ष्मी आणि सरस्वती मानतात. पण जेव्हा तीच मुलगी हट्टी बनते, संस्कारांचा आदर करत नाही, आई-वडिलांचे किंवा ज्येष्ठांचे ऐकत नाही आणि दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत पळून जाण्याचा विचार करते, तेव्हा पालकांनी सतर्क राहून अशा मुलींना मारहाण करत वठणीवर आणले पाहिजे.” सोशल मीडियावर वाद साध्वी प्रज्ञासिंह यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावरून तीव्र टीका होत आहे. त्यांच्या या वक्तव्याने हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आरोप होत आहे. विशेषतः, दुसऱ्या धर्माच्या मुलांसोबत जाणाऱ्या मुलींचे पाय तोडण्याचे विधान अत्यंत आक्षेपार्ह मानले जात आहे. यापूर्वीही साध्वी प्रज्ञासिंह यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली असून, त्यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.