प्रभात इफेक्ट.! अखेर ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्याची तडकाफडकी बदली; ‘दैनिक प्रभात’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय!

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तिसऱ्यांदा नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेतला असून, याबाबतचे पत्र दि. ५ रोजी ग्रामस्थांना पाठविण्यात आले आहे.
या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून अन्याय सहन करणाऱ्या नऊ गावांच्या ग्रामस्थांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून, सोमवार (दि. ६) रोजी होणारे उपोषण सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे व सरपंच अरुणताई घोडे यांनी दिली.
टाकळी हाजी, फाकटे, वडनेर, जांबुत, पिंपरखेड, माळवाडी, काठापुर, सरदवाडी आणि चांडोह या नऊ गावांतील ग्रामस्थांनी अनेक महिन्यांपासून तक्रारी, अर्ज आणि विनंत्या केल्या होत्या. वैद्यकीय अधिकारी केंद्रात कायमस्वरूपी न राहत असल्याने नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी उपचार मिळत नव्हते. अनेकवेळा गंभीर रुग्णांना जीव मुठीत धरून शिरूरकडे धाव घ्यावी लागत होती.
या गंभीर दुर्लक्षाबद्दल ‘दैनिक प्रभात’ने ठाम भूमिका घेत सलग बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर या पाठपुराव्याला यश येत डॉ. घुगे यांची बदली झाली, ही बाब ‘दैनिक प्रभात’च्या पत्रकारितेच्या सजगतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पहिली चौकशी समिती टाकळी हाजी येथे दाखल झाली.
मात्र तिने ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेता केवळ वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदवून खोटा अहवाल तयार केल्याचे समोर आले. स्वतः तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी यांनी “वरिष्ठांच्या दबावामुळे खोटा अहवाल द्यावा लागला” असे मान्य केले होते. दुसऱ्या वेळेस पुन्हा तीच समिती पाठविल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तिला हाकलून लावले.
अखेर तिसऱ्यांदा नव्याने गठीत समिती दि. ३ रोजी टाकळी हाजी येथे आली. यावेळी सरपंच अरुणताई घोडे, नितीन पिंगळे व ग्रामस्थांनी ठोस पुरावे सादर करत वैद्यकीय अधिकारी केंद्रात राहत नसल्याचे निर्विवाद दाखले दिले. औषधांच्या नोंदीतील गडबडी, गैरहजेरीची पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे समितीला सत्य स्वीकारावे लागले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण प्रकरणात एका बड्या कलेक्टरचा दबाव होता, त्यामुळे वारंवार चौकशी समित्या पक्षपाती वागणूक देत होत्या. मात्र ग्रामस्थांनी एकजुटीने ठामपणे भूमिका घेतली आणि अखेर प्रशासनाला निपक्षपाती चौकशी करून बदलीचा निर्णय घ्यावा लागला.
ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जर सोमवारपासून उपोषण सुरू झाले असते, तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून हा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर परिसरात आनंदाचे वातावरण असून, “आता तरी आमच्या आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष डॉक्टर राहतील” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या महीनाभर केलेल्या संघर्षाला यश मिळवून देण्यात ‘दैनिक प्रभात’च्या सातत्यपूर्ण वृत्तांकनाने महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणून ग्रामस्थांकडून वृत्तपत्र प्रतिनिधींवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. “ग्रामस्थांची एकजूट, सत्यासाठीचा संघर्ष आणि सजग पत्रकारितेचा आवाज हे एकत्र आले, की अन्यायाला शेवटी नमावे लागते हे या घटनेतून सिद्ध झाले आहे.





