ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचा राज्य सरकारला सल्ला
पुणे – “पूरस्थितीतून सगळे नव्याने उभे करण्यासाठी किमान पाच ते सहा वर्षे लागतील. अशा वेळी भंपकपणा करून उपयोग नाही. कोटींचे आकडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे. आचारसंहिता लागली, की कामात अडचणी येतात. त्यामुळे निवडणुका किमान दोन ते तीन महिने पुढे ढकला,’ असा सल्ला ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी केला. पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना “नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले आदी उपस्थित होते. निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांना “नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार’, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांना “नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, भाऊसाहेब भोईर यांना “नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
“राजकारण्यांना लाजवेल असे राजकारण आमचे साहित्यिक करतात. निवडणुकीत एकगठ्ठा मते, मतांची पळवापळवी होते. कविता साहित्यासाठी आयुष्य वेचलेले दिग्गजही संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत पडले. साहित्य संमेलनाबद्दल न बोललेलेच बरे, अशी टिपण्णी महानोर यांनी केली. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केले.