मुंबई : गुंतवणूकदारांना सध्या अनेक गुंतागुंतीच्या मुद्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात खरेदी- विक्रीच्या लाट येत आहेत. बिहारसारख्या मोठ्या राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्यामुळे काही प्रमाणात खरेदी होऊन निर्देशांकामध्ये वाढ होण्यास मदत झाली. जागतिक नकारात्मक परिस्थितीमुळे सकाळी निर्देशांक अर्धा टक्क्यापर्यंत कोसळले होते. मात्र नंतर बिहार निवडणुकीचे निकाल बाहेर आल्यानंतर खरेदी वाढून निर्देशांकात अल्प प्रमाणात वाढ होण्यास मदत झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 84 अंकांनी वाढून 84,562 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांनी म्हणजे 0.12 टक्क्यांनी वाढून 25,910 अंकावर बंद झाला. कालपर्यंत अमेरिकेत सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र फेडरल रिझर्वच्या अधिकार्यांनी व्याजदर कपात शक्य नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे भाव पुन्हा कोसळले. अशा परिस्थितीत जागतिक वातावरण नकारात्मक होते. भारतात किरकोळ आणि घाऊक किमतीवरील महागाई कमी झाली आहे. बिहारमध्ये स्थिर सरकार येण्याची शक्यता आहे, या सकारात्मक घडामोडी घडल्या. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार विक्री करत होते तर काही खरेदी करीत होते. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार निर्देशांकांना भक्कम आधार देत आहेत. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 8,461 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालूच असून या गुंतवणूकदारांनी गुरुवारी 4,968 कोटी रुपयांच्या शेअर्स विक्री केली.