Sanjay Raut : राजकारण तापणार! राऊतांचा नवा बॅाम्ब; थेट शिक्षण खात्यावर खळबळजनक आरोप “संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावर…”
Sanjay Raut : आज त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक आरोप केला.

Sanjay Raut : “महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यात पेपरफुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत आणि शाळांच्या मंजुरीपर्यंत फक्त पैशांचा खेळ सुरु आहे. शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रुपये घेतले जात असून २०० कोटी जमा केले आहेत. शाळांना मंजुरी देताना संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावर ५ ते १० लाख रुपये द्यावे लागत आहेत,” असा अत्यंत खळबळजनक आरोप उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक आरोप केला.
नुकतेच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या भर्तीत पेपर फुटला असल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. अशातच संजय राऊतांनी थेट महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याला लक्ष करत मोठा दावा केला आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकार टीकेचे धनी बनले. सोशल मीडियावर उद्यास आलेल्या कोक्राच जनता पार्टीने मोठा लढा उभा केला. या लढ्याला यशही आलं. महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटला. यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. टीईटीचा पेपर फोडणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या. या पेपरफेटीची चौकशी केली जात असून, विरोधकांकडून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“महाराष्ट्रात सातत्याने पेपरगळती सुरु आहे. एमपीएसससी, औषध निरीक्षक, टीईटी पेपरफुटीनंतर विद्यापीठातून बोगस डिग्रीचा, मार्कशीटचा घोटाळा समोर आला आहे. महाराष्ट्रात २००० शाळा बंद पडल्या असताना नवीन शाळांना मंजुरी देताना संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावर ५ ते १० लाख रुपये द्यावे लागत आहेत. मंजुरीचा कागद, इरादापत्राचा कागद असे अनेक मुद्दे आहेत.”
…त्याला फडणवीस आणि केंद्रात मोदी, शाह जबाबदार : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले “शिक्षणाचं आदर्श केंद्र असणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षणाची अव्यवस्था सुरु आहे. फडणवीस काय करत आहेत? जंतर मंतरला आंदोलन झालं की शिव्या घाला. आम्ही काही टीका केली की वेडंवाकडं बोला. महाराष्ट्र शिक्षणात पूर्ण रसातळाला गेला आहे, त्याला फडणवीस आणि केंद्रात मोदी, शाह जबाबदार आहेत, असा घाणाघात संजय राऊतांनी केला आहे.
मी सर्व पुरावे सादर करणार : संजय राऊत
आमचं काम आरसा दाखवणं आहे. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अराजकता माजली आहे. मी सर्व पुरावे सादर करणार आहे असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात संजय राऊत नेमकं कोणतं पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






