MLA Mahendra Dalvi : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते असून त्यांचं कामच फसवणूक करणं आहे, असा आरोप दळवी यांनी तटकरेंवर केला होता. यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आता पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे हे ब्लॅकमेलिंग करतात, असं दळवी म्हणाले आहेत. त्यांच्या या आरोपामुळे आता राजकीय वातावरण तापणार असल्याचं बोललं जातं आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधीही युती करणार नाही. आम्ही ‘एकला चलो’ या भूमिकेत आहोत, असेही महेंद्र दळवी यांनी याअगोदर म्हटलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली असून महायुतीतील संघर्ष समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अलिबाग हेमनगर येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदारकीच्या दुसऱ्या विजयासाठी त्यांची तुला शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा समाचार घेत गंभीर आरोप केला. नेमका वाद कशामुळे? शिवसेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजू साबळे यांनी मानगावमधील त्यांच्या शिक्षण संस्थेतील एका शाळेला मंत्री भरत गोगावले यांच्या आईचे नाव देण्याचं ठरवलं होतं मात्र, ऐनवेळी त्यांनी नाराज होऊन नाव काढून तटकरे यांच्या आईचे नाव दिल्याने हा वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जातं आहे. महायुतीतीच रस्सीखेच होणार असल्याची शक्यता आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून वरिष्ठांचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र महायुतीतच राहुन कोणी वेगवेगळे प्रयोग केले तर त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी करु असा इशारा महेंद्र दळवी यांनी याअगोदरच दिला होता. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतीच रस्सीखेच होणार असल्याची दाट शक्यता दिसत आहे. हेही वाचा : Pune : प्रभाग रचनेची प्रतीक्षा संपणार; सहा बदल नावांचे, तर ८ ते १० बदल हद्दीचे?