PMC News : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पन्नास-साठ वर्षांपूर्वी बांधलेल्या ९ धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करून पाडणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. या इमारती वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट परिसरातील आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून पावसामुळे त्या कधीही पडतील अशी त्यांची अवस्था आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचे प्रमाण पाहता पावसाळ्यात किंवा त्यापूर्वी पुन्हा असा पाऊस झाल्यास कामगारांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे या ९ इमारती तसेच शहरातील धोकादायक ३२ वाडे पाडण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी या इमारती बांधल्या आहेत. ५ एकर जागेत या नऊ इमारती असून प्रत्येकी तीन मजल्यांच्या इमारतींमध्ये सुमारे २८८ सदनिका आहेत. या इमारती ५० ते ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. पालिकेने या इमारती रिकाम्या करून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बांधकाम विभागाने कामगारांना नोटीसा दिलेल्या असल्या तरी ते इमारती खाली करत नाहीत. या इमारती पाडण्यापूर्वी आपले तात्पुरते पुनर्वसन याच भागात करावे अशी त्यांची मागणी आहे. महापालिका त्यांना वारजे, हडपसर भागात घरे देण्यास तयार आहे. मात्र, कामगारांची तेथे जाण्याची इच्छा नाही. त्यांच्या इच्छेनुसार महापालिका त्यांना याच भागात सदनिका देऊ शकत नाही. एवढया मोठया प्रमाणावर आसपासच्या भागात सदनिका उपलब्ध नसल्याने त्यांना याच परिसरात घरे देणे शक्य नाही, अशी पालिकेची भूमिका आहे. या स्थितीत पालिका प्रशासनाने आता पुन्हा एकदा घरे रिकामी करण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजाविल्या आहेत. पाटील इस्टेट,वाकडेवाडी ३२ वाडेही खाली करणार महापालिकेने मागील वर्षी शहरातील धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात, ३२ वाडे कोसळण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष हाती आला होता. यामुळे महापालिकेने या वाडयाच्या मालकांना तसेच रहिवाशांना नोटीसा बजाविल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडूनही अद्याप वाडे रिकामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, मालकांनी हे वाडे खाली करून उतरवले नाही तर पोलिसांच्या मदतीने हे वाडे रिकामे करण्याचे काम महापालिका करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. “या नऊ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले आहे. त्यामुळे त्या तातडीनं पाडणे गरजेचे आहे. त्यासाठी या रहिवाशांना आर ७ अंतर्गत मिळालेल्या सदनिकांचे पर्याय देण्यात आले आहेत. मात्र, ती घरे लांब असल्याने याच भागात पुर्नवसन करावे अशी त्यांची मागणी आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.” – संदीप खलाटे ( उपायुक्त, चाळ विभाग) “महापालिकेने पुनर्वसनाच्या नावाखाली १२ ते १३ वर्षे देखभाल दुरूस्तीच केलेली नाही. महापालिकेने आम्हाला नोटीसा दिल्या असल्या तरी आमचे तात्पुरते पुनर्वसन याच भागात करावे अशी आमची मागणी आहे. तसेच, यापूर्वीही आम्ही आमची भूमिका महापालिकेकडे स्पष्ट केली आहे. त्यामुळे हा निर्णय होई पर्यंत आम्ही घरे रिकामी करणार नाही.” – संतोष कोंडे ( रहिवासी )