PMC Negligence: स्मार्ट सिटीचा खेळखंडोबा! ‘व्हीएमडी’ स्क्रीन रस्त्याच्या कडेला; पालिकेकडून मालमत्तेची उधळपट्टी?
PMC Negligence: पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत बसवलेले १६१ व्हीएमडी स्क्रीन पालिकेकडे हस्तांतरित; मात्र योग्य नियोजनाअभावी अनेक ठिकाणी पडले बंद.

PMC Negligence : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात १६१ ठिकाणी व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले (व्हीएमडी) बसविण्यात आले होते. केंद्र शासनाने स्मार्ट सिटी उपक्रम बंद केल्यानंतर हे व्हीएमडी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, ते पुन्हा कार्यान्वित करण्याऐवजी लाखो रुपयांचे व्हीएमडी काढून रस्त्याच्या कडेला टाकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेला एक व्हीएमडी चक्क रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला आहे.
प्रत्यक्षात लाखो रुपयांची मालमत्ता असलेला हा व्हीएमडी सुस्थितीत काढून त्याचे स्थलांतर करणे अपेक्षित असताना तो अशा पद्धतीने टाकण्यात आल्याने तो अखेर भंगारात निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजस सोसायटी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरात एकूण ७२० स्मार्ट एलिमेंट्स उभारण्यात आले होते.
त्यामध्ये ३०० वाय-फाय स्पॉट्स, १६१ व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले (व्हीएमडी), १३६ आपत्कालीन कॉल बॉक्स, १३६ सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, ५० पर्यावरणीय सेन्सर्स आणि ४० पूर सेन्सर्सचा समावेश होता. या यंत्रणांद्वारे शहरातील विविध सेवा एकत्रित करून प्रशासनाला दैनंदिन कामकाज आणि आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेणे सुलभ होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात २०१९ मध्ये हे व्हीएमडी सुरू करण्यात आल्यानंतर त्यांचा फारसा वापरच झाला नाही.
काही काळ एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने त्यावर शहरातील वाहतुकीची माहिती दर्शविण्यात आली. त्यानंतर हे व्हीएमडी मुख्यतः महापालिकेच्या शासकीय जाहिरातींपुरतेच मर्यादित राहिले. स्मार्ट सिटी उपक्रम बंद झाल्यानंतर शहरातील अनेक व्हीएमडीची दूरवस्था झाली आहे. काही ठिकाणी त्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत, काहींच्या डिजिटल स्क्रीन खराब झाल्या आहेत, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा नसल्याने ते बंद अवस्थेत आहेत.
नियोजनाचा अभाव
शहरातील विविध रस्ता रुंदीकरणाच्या कामांमध्ये हे व्हीएमडी अडथळा ठरत आहेत. अशा स्थितीत ते काळजीपूर्वक काढून अन्य ठिकाणी पुन्हा वापरासाठी बसविणे अपेक्षित असताना कात्रज-कोंढवा रस्त्यावर लाखो रुपयांचा व्हीएमडी थेट रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे. धूळ आणि पावसाळ्यात पाणी साचल्याने हा व्हीएमडी पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी कराच्या माध्यमातून भरलेल्या पैशांची ही उघड उधळपट्टी असून याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.






