PMC Abhay Yojana – मिळकतकर थकबाकीदारांसाठी महापालिका प्रशासनाकडून अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची मुदत १५ फेब्रुवारीला संपत असून, योजनेसाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून येत्या शनिवारी (दि. १४) आणि रविवार (दि. १५) या दोन्ही दिवशी महापालिकेची करभरणा केंद्र रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ऑनलाइन, तसेच प्रत्यक्ष केंद्रांवर जाऊन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.महापालिकेमार्फत ही योजना प्रथम १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आली होती. नागरिकांच्या प्रतिसादामुळे योजनेला १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत मोठ्या प्रमाणात करवसुली झाली असली, तरी अनेक थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा केलेला नाही. त्यामुळे आता करवसुलीसाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या प्रकरण ८ मधील करधारण नियम ४२ नुसार थकबाकीदार मिळकतींवर अटकवणीची कारवाई सुरू असून, आतापर्यंत १८८ मिळकती सील करण्यात आल्या आहेत. थकबाकी कायम राहिल्यास पुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. योजनेतून ७८० कोटींचा महसूल महापालिका प्रशासनाकडून अभय योजनेअंतर्गत साडेचार लाख मिळकतधारकारकांना थकबाकीच्या व्याजावर ७० टक्के सवलत दिली जाणार होती. मात्र, मागील तीन महिन्यांत केवळ १ लाख ३२ हजार ७७१ मिळकतधारकांनी गुरुवारअखेर पर्यंत ७८० कोटी १० लाख ८८ हजार २८८ रुपयांचा मिळकतकर जमा केला आहे. याच कालवधीत नियमित कर भरणाऱ्या सुमारे १५,७०१ मिळकतधारकांनी ९१ कोटी ८८ लाख ५ हजार ७८५ रुपयांचा कर जमा केला आहे.