देशाची अर्थव्यवस्था मजबूत होताच पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; जीडीपी वाढीबद्दल काय म्हणाले ते जाणून घ्या…

GDP Growth: भारताच्या जीडीपीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ५.६% च्या वाढीपेक्षा हा दर लक्षणीयरीत्या जास्त आहे. आता, पंतप्रधान मोदींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
८.२% जीडीपी वाढ ही खूप चांगली गोष्ट – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले, “२०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीतील ८.२% जीडीपी वाढ ही अत्यंत उत्साहवर्धक आहे. ही आमच्या प्रगतीशील धोरणे आणि सुधारणांचा परिणाम आहे. तसेच, ही आपल्या जनतेच्या परिश्रम आणि उद्योगशीलतेचेही प्रतिबिंब आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी आणि Ease of Living वाढवण्यासाठी आमचे सरकार सुधारणांची वाटचाल असाच पुढे नेत राहील.” भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ झाली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत ५.६ टक्के असलेल्या जीडीपी वाढीच्या तुलनेत ८.२ टक्के इतकी मजबूत जीडीपी वाढ नोंदवली गेली.
The 8.2% GDP growth in Q2 of 2025-26 is very encouraging. It reflects the impact of our pro-growth policies and reforms. It also reflects the hard work and enterprise of our people. Our government will continue to advance reforms and strengthen Ease of Living for every citizen.
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2025
सांख्यिकी मंत्रालयाने अहवाल दिला आहे की, दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रांमध्ये अनुक्रमे ८.१ टक्के आणि ९.२ टक्के वाढ झाली, ज्यामुळे एकूण जीडीपी ८ टक्क्यांपेक्षा जास्त झाला. उत्पादन क्षेत्र ९.१% वाढले, तर बांधकाम क्षेत्र ७.२% वाढले. वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रांमध्ये १०.२% ची दोन अंकी वाढ नोंदवली गेली.
कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ३.५% वाढ तर वीज, वायू, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता क्षेत्रांमध्ये ४.४% वाढ झाली. वास्तविक खाजगी अंतिम वापर खर्च (पीएफसीआय) ७.९% वाढला, जो अर्थव्यवस्थेत वाढलेले उत्पन्न आणि रोजगार निर्मिती दर्शवतो.
दरम्यान, अमेरिकेच्या शुल्क वाढीसारख्या जागतिक आव्हानांना न जुमानता, भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अंदाज लावला आहे की २०२५-२६ मध्ये भारत ६ टक्क्यांपेक्षा जास्त दराने वाढणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल.





