Piyush Goyal: केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान यांच्याशी अर्थसंकल्पातील तरतुदी बाबत चर्चा केली. यावेळी बरेच गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड व्यवस्थापक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर गोयल यांनी सांगितले की, अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत शेअर बाजार प्रमुख व गुंतवणूकदारांसह इतर उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा केली. जागतिक व्यापारातील वातावरण खराब असताना भारताचा विकास दर वाढावा, गुंतवणूक वाढावी यासाठी अर्थसंकल्पात पुरेशा तरतुदी करण्यात आल्या असल्याचे मत या गुंतवणूकदारांनी आपल्याकडे व्यक्त केले असा दावा गोयल यांनी केला. स्थूल अर्थव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गुंतवणूकदाराकडून आपण काही सूचनाही मागविल्या होत्या, असे गोयल यांनी सांगितले. फ्युचर्स व ऑप्शन्सवरील व्यवहारावर करामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे रविवारी शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले होते. यामुळे बर्याच ब्रोकरेज कंपन्यांनी असमाधान व्यक्त केले होते. यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आणखी भारतातील गुंतवणूक कमी करण्याचा धोका व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी या गुंतवणूकदाराबरोबर चर्चा केली असल्याचे समजले जाते. या करातून सरकारला आर्थिक वर्ष 2027 -27 मध्ये 73,700 कोटी रुपये कर संकलन अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय करासाठी घेतलेला नाही तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या हितासाठी घेतला असल्याचे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर व्यक्त केले होते. काही गुंतवणूकदारांनी सांगितले की, सरकारच्या कर वाढविण्याच्या निर्णयाचा केवळ गुंतवणूकदारावरच नाहीत तर ब्रोकरेज संस्था आणि मालमत्ता व्यवस्थापन संस्था वरही परिणाम होण्याची शक्यता आहे.