Pimpri : पवना धरणातील पाणीसाठा ४९ टक्क्यांवर

पवन मावळ : मावळ तालुक्यातील पवना धरणात आजमितीस (दि.२१ मार्च) ४९.३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणातील पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी घटू लागली असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पवन मावळ विभागात असणारे पवना धरण हे यंदा (गतवर्षी पावसाळ्यात) पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले होते. पवना धरणावर पिंपरी-चिंचवड शहर, लहान मोठे उद्योग व्यवसाय, मावळ तालुक्यातील अनेक खेडी व तेथील शेती अवलंबून आहे.
यामुळे धरण पूर्ण भरलेले असले तरीही पाण्याची मागणी व अन्य कारणाने होणारी घट यामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या पवना धरणात असलेला पाणीसाठा जून अखेर पर्यंत पुरेल, असे नियोजन केल्याचे पवना धरण उपविभागाचे अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले. तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे असेही त्यांनी सांगितले आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा अधिक जलसाठा
पवना धरणात शुक्रवारी (दि.२१) घेतलेल्या माहितीनुसार ४९.३० टक्के इतका पाणीसाठा होता. परंतु मागच्या वर्षी याच तारखेला म्हणजे २१ मार्च २०२४ रोजी हा पाणीसाठा ४८.७५ टक्के इतका होता. याचा अर्थ यंदा धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. असे असले तरीही यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असून पाणी घटण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी नियोजन व व्यवस्थापन गरजेचे आहे. धरण विभागाने पाणी जून अखेर पुरेल असे नियोजन केले असले तरीही नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून गरजेनुसार पाणी वापरले पाहिजे.





