“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचं म्हणून…”; महायुतीतील मंत्र्याच्या विधानामुळे वाद

Babasaheb Patil | महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा देखील केली जात आहे. मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या जोर धरत आहेत. सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पाटील यांनी ‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं म्हणून निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो,’ असे विधान केले आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यभरातून शेतकऱ्यासाठी मदत पोहचली जात आहे. असे असताना सहकारमंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. या वाद निर्माण होण्यास सुरुवात झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधत दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते बाबासाहेब पाटील?
“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीही देखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा,” असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावरून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाची भावना दुखावली असून, विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. Babasaheb Patil |
राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बाबासाहेब पाटील हे ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते आहेत. लातूरसारख्या दुष्काळी भागातून ते येतात. तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहित आहे. बाबासाहेब पाटील यांच्यासारख्या मंत्री ज्यांच्याकडे सहकार खाते आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असे बोलत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मुळात शेतकरी कर्जबाजारी का झाला तर सरकारच्या धोरणामुळे झाला. शेतकऱ्याची चेष्टा करण्याच्या ऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी,” असे म्हणत राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. तर भाजपाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाबासाहेब पाटील यांच्या विधानावर बोलताना सरकारममधील कोणीही अशी वक्तव्य करु नये, असे सांगितले आहे. Babasaheb Patil |
याआधी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडूनही शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. यातच त्यांचा सभागृहात ऑनलाईन गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कोकाटे यांच्यावर टीका झाली. आता पुन्हा अजित पवारांच्या आमदाराकडून कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सारा खान आंतरधर्मीय लग्नामुळे ट्रोल; व्हिडिओ शेअर करत दिले सडेतोड उत्तर





