ऊसतोड कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळला

मुंबई – राज्यातील ऊसतोड कामगार यांना आपापल्या घरी सोडण्या संदर्भामध्ये राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामध्ये ज्या ऊसतोड कामगारांचे 14 दिवस क्वॉरंटाईनचे पूर्ण झाले आहेत. अशा ऊसतोड कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्या घरी सोडण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे.
शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातील जवळपास 38 साखर कारखान्यांवर 1 लाख 31 हजार पाचशे ऊसतोड कामगार अडकले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अशा कामगारांना त्यांच्या घरी पोहचवावे, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ज्या ऊसतोड कामगारांचे साखर कारखान्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी 14 दिवस पूर्ण झाले आहेत. अशा ऊसतोड कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्यामध्ये सर्दी-खोकला-ताप अशी कोणतीही लक्षणे नाहीत, असे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरच अशा ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी सोडण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.
या ऊसतोड कामगारांना स्वगृही परत पाठवण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी योजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगारांची जिल्हा, तालुका आणि गावनिहाय कामगारांची संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यास सांगितली आहे. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. यासंबंधी शासनाने आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा.
– धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री





