प्रभात वृत्तसेवा पारनेर – आमदार काशिनाथ दाते यांच्या पुढाकाराने पारनेर साखर कारखाना बचाव समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक मंगळवारी ७ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.या बैठकीत पारनेर कारखाना बचाव समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या मागण्यांसंदर्भात साखर कारखान्याशी निगडीत महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताचे आणि कारखाना पुनरुज्जीवनाचे प्रश्न ठामपणे मांडण्यात आले. सहकारमंत्री पाटील यांनी सर्व बाजूंचे बारकाईने ऐकून घेत, सहकार व महसूल विभागाकडून व्यवस्थित आढावा घेऊन पुढील बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, साखर संचालक केदारी जाधव, क्रांती शुगरचे प्रशासकीय अधिकारी आनंदा माने, पारनेर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम, दिलीप दिघे, रामदास घावटे, रामदास झावरे, बबन कवाद, संतोष वाडेकर, बबनराव सालके, साहेबराव मोरे, बाबासाहेब बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मागण्यांच्या अनुषंगाने सहकार व महसूल विभागाकडून लवकरच आढावा घेऊन पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचा शब्द सहकारमंत्री पाटील यांनी आमदार दातेंसह उपस्थित सर्वांनाच दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.