उर्फी जावेद प्रकरणी पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,”समाजात गंभीर…”

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. उर्फी जावेदच्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे आणि महिला आयोगाकडेपण केली आहे.त्यावरून वाघ यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला आणि अप्रत्यक्षपणे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले आहे.दरम्यान, रुपाली चाकणकर यांनीदेखील चित्रा वाघ यांना कायदेशीर उत्तर देत नोटीस बजावली. या सर्व मुद्द्यांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल’ या संघटनेतर्फे नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात सुरु असलेल्या वादावर विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मला यावर काही बोलायचं नाही. वाद घालणाऱ्या राजकारण्यांना संयमाचा सल्ला कशाला देऊ. पण, हे रंगवून सांगणाऱ्या माध्यमांना सल्ला देईन की, खऱ्या विषयांकडे लक्ष द्या. समाजात गंभीर राजकारण आणि समाजकारण करण्याची आवश्यकता आहे,” असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, “महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. ज्यात सीरीजच्या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन असा अयोग्य संदेश जातोय. या सीरीजला नोटीस पाठवायला महिला आयोगाला वेळ आहे, पण उर्फीला नाही,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी असल्याचं नमूद करत महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे चित्रा वाघ आणि आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातील वाद चिघळला आहे.
महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांनी म्हटलं की, “आयोग ही एक स्वतंत्र आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था आहे. अध्यक्षपदी बसलेली व्यक्ती चुकीची असली तरी आयोगावर आमचा विश्वास आहे. असल्या नोटीसींना मी घाबरत नाही. असल्या ५६ नोटीसा येतात. त्यामुळे मी नोटीसला माझ्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे,” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.





